
सातारा दि. 14 : कराड तालुक्यातील साजूर, तांबवे, किरपे शेनोली गावातील रस्त्याच्या कामामुळे गावातील नागरिकांना व शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने रस्त्याचे काम तात्काळ थांबवण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
पाटण येथील शासकीय विश्रामगृहात कराड तालुक्यातील राजुरेश्वर, एकेश्वरी तांबवे पाणीपुरवठा योजना संदर्भात साजुर, तांबवे, किरपे, शेणोली रस्ता क्रॉसिंगबाबत बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कराड उपविभागाचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, कराडचे तहसीलदार कल्पना ढवळे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पायाभूत सुविधा महामंडळाचे कार्यकारी अभियंता नजीर नायकवडी, कराडचे गट विकास अधिकारी प्रताप पाटील आदी उपस्थित होते.
साजूर, तांबवे, किरपे, शेनोली गावातील रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, रस्त्याचे काम सुरू करताना स्थानिक नागरिकांच्या व शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी विचारात घेण्यात आल्या नाहीत. कामे करताना नळ योजनांच्या पाईपलाईन काढल्यामुळे पिण्याच्या व वापराच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. पडणाऱ्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिले आहे. आवश्यक त्या ठिकाणी रस्त्याकडेला बंदिस्त गटारीचा काढण्याचा विचार करण्यात आला नाही. या कामाविषयी लोकांच्या तीव्र भावना आहेत.
जोपर्यंत शेतातील पाणी काढून ओढ्याला जोडले जाणार नाही, नळ योजनांच्या नवीन पाईपलाईन टाकून नळ योजनेचे पाणी चालू करून देणे, गावांच्या बाजूला गटारांची व्यवस्था करणे ही कामे केल्याशिवाय रस्त्याचे काम सुरू करण्यात येऊ नये, असे सक्त निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बैठकीत दिले. मंत्रालयात याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीस संबंधित गावचे नागरिक उपस्थित होते.
000