
सातारा दि. 30 : सातारा ते लातूर व सातारा ते पंढरपूर महामार्गाचे काही ठिकाणी अर्धवट काम राहिले आहे. यामुळे अपघात होऊन नागरिक जखमी होत आहेत. ही गंभीर बाबा असून रस्ते विकास महामंडळाने अर्धवट कामे प्राधान्याने पूर्ण करावेत, असे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सातारा ते लातूर व सातारा ते पंढरपूर महामार्गाविषयी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव यांच्यासह रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
मौजे धुळदेव ता. माण येथील अर्धवट रस्त्याच्या कामामुळे मोठ्या प्रमाणत या ठिकाणी अपघात होत आहेत. हा रस्ता तातडीने पूर्ण करावा, अशा सूचना करुन ग्रामविकास मंत्री श्री. गोरे म्हणाले, दिवड हद्दीत पुलाचे काम अर्धवट असून काम पूर्ण होईपर्यंत येथील रस्त्यावर डांबरीकरण करावे. मौजे पळशी येथील 50 मिटर रस्ता अर्धवट असून या ठिकाणी डांबरीकरण करावे.
मौजे गोंदवले ब्रु. येथील ब्रम्हचैतन्य मंदिर ते शेतकरी भवन या ठिकाणी नियमापेक्षा उंच गतीरोधक केले आहेत ते काढून शासकीय निकषा प्रमाणे गतीरोधक तयार करावा. चिमणगाव ता. कोरेगाव येथील 30 मीटर रस्ता अपूर्ण आहे तो तातडीने पूर्ण करावा. तसेच सोलापूर जिल्ह्यातील मौजे पिलीव ते पंढरपूर या रस्त्याच्या अर्धवट कामाच्या ठिकाणी डांबरीकरण करावे, असे निर्देशही ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांनी दिले.
0000





















WhatsApp