
मुंबई, दि. ७ : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि उद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इको-फ्रेंडली गणेश मूर्ती रंगरंगोटी महोत्सव-२०२६’ तसेच खादी वस्त्रे व ‘मधुबन’ मध विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे मंगळवार, ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत होणार आहे.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत ग्रामीण आणि सूक्ष्म उद्योजकांना उद्योगाभिमुख मार्गदर्शन, प्रोत्साहन तसेच विपणन सहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. मंडळाच्या नियंत्रणाखाली पुणे येथे कार्यरत असलेली हातकागद संस्था ही जुनी व ऐतिहासिक संस्था असून, संस्थेमार्फत विविध प्रकारच्या पर्यावरणपूरक हातकागदाची निर्मिती केली जाते.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील हातकागद संस्थेमार्फत पांढऱ्या चिंध्यांपासून तयार केलेल्या हातकागदाच्या लगद्याचा वापर करून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यात येतात. तसेच पर्यावरणपूरक आकाशकंदीलही तयार केले जातात. या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मंडळामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती करणे, हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. महोत्सवात पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची रंगरंगोटी करण्याची संधी नागरिकांना मिळणार असून, त्यासोबतच खादी वस्त्रे आणि ‘मधुबन’ मधाची विक्री व प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे.
या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश पुढे न्यावा आणि पर्यावरण संरक्षणाच्या कार्यात आपला हातभार लावावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत यांनी केले आहे.
000
संजय ओरके/विसंअ

WhatsApp