
मुंबई, दि. १२ : जळगाव तसेच भुसावळ येथे सुरू असलेली ऊर्जाविषयक कामे ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात यावीत. उपकेंद्र रोहित्र क्षमता वाढविणे, नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे यासारखी कामे पावसाळ्यात करणे शक्य नसल्याने ही सर्व कामे पुढील दोन महिन्यांत कंत्राटदारांकडून तातडीने पूर्ण करून घ्यावीत, असे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी संयुक्तरित्या दिले.

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या उपस्थितीत जळगाव व भुसावळ येथील प्रलंबित ऊर्जाविषयक कामांचा आढावा घेण्यासंदर्भातनिर्मल भवन येथील एमएसआरडीसी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० तसेच एआयआयबी (AIIB) योजनेंतर्गत भुसावळ विभागातील जळगाव मंडळ व जळगाव परिमंडळात सुरू असलेल्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीस ऊर्जा विभागाचे मंत्रालयीन वरिष्ठ अधिकारी तसेच जळगाव व भुसावळ येथील महावितरण आणि महापारेषणचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
ऊर्जा राज्यमंत्रीसाकोरे- बोर्डीकर म्हणाल्या की, उपकेंद्र रोहित्र क्षमता वाढविणे, नवीन सबस्टेशन उभारणे तसेच ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या कामांमध्ये अपेक्षित प्रगती दिसून येत नसल्याने त्यामुळे कंत्राटदारांनी दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण होतील, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देऊन कामांचा वेग वाढवावा. तसेच या प्रकल्पांच्या व्यवस्थापनासोबत नियमितपणे आढावा बैठका घेण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
0000
संजय ओरके/विसंअ




















WhatsApp