
मुंबई, दि.९ : जल जीवन मिशनअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या गोंदिया ग्रीड पाणीपुरवठा योजनेचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
मंत्रालयात मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गोंदिया ग्रीड पाणीपुरवठा योजनेसह गोंदिया मतदारसंघातील विविध पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला.
गोंदिया ग्रीड पाणीपुरवठा योजनेत एकूण ५६ गावांचा समावेश आहे. काही गावांमध्ये जागेची उपलब्धता तसेच तांत्रिक अडचणींमुळे कामे सुरू होऊ शकलेली नाहीत. अशा ठिकाणच्या अडचणी तातडीने दूर करून कामे सुरू करावीत, असे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.
या योजनेअंतर्गत ५२ पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम प्रगतीपथावर असून त्यापैकी ५० टाक्यांची स्थापत्य कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित दोन टाक्यांची कामे प्रगतीपथावर असून तीही लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
गोंदिया मतदारसंघातील उर्वरित योजनांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. ज्या गावांमध्ये योजनांची कामे विलंबाने सुरू आहेत, त्या ठिकाणी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून अडथळे दूर करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीस गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन-नैनुटीया, सहसचिव गीता कुलकर्णी, मुख्य अभियंता तथा विशेष कार्य अधिकारी प्रशांत भामरे, जल जीवन मिशनच्या अतिरिक्त संचालक दीपाली देशपांडे, अधीक्षक अभियंता अजय सिंग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नागपूर येथील कार्यकारी अभियंता दीपक वाघ, गोंदिया येथील कार्यकारी अभियंता नरेश गणवीर आदी उपस्थित होते.
0000
गजानन पाटील/विसंअ

WhatsApp