
मुंबई, दि. १३ : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य प्रवाशांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी, दर्जेदार आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने बसताफ्याच्या विस्तारासोबतच आधुनिकीकरणाला वेग दिला आहे. नव्या बसेसच्या माध्यमातून एसटीची सेवा अधिक सक्षम करण्याचा संकल्प करण्यात आला असून, त्याच दिशेने पाच हजार ‘लालपरी’ बसेसच्या खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
या निविदा प्रक्रियेत सर्वांत कमी दराचा देकार टाटा मोटर्ससारख्या नामांकित आणि विश्वासार्ह संस्थेने सादर केला आहे. त्यामुळे बसेसच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
मंत्री श्री. सरनाईक म्हणाले की, नव्या पाच हजार ‘लालपरी’ बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर ग्रामीण महाराष्ट्राची ‘लोकवाहिनी’ असलेल्या एसटीला मोठी बळकटी मिळणार आहे. नव्या बसेसमुळे जुन्या बसेसवरील ताण कमी होईल, बसफेऱ्यांची उपलब्धता वाढविणे शक्य होईल आणि प्रवाशांना अधिक चांगली सेवा देता येईल. जुन्या व गळक्या बसेस तसेच प्रवासादरम्यान बसेस बंद पडण्याच्या समस्येवरही नव्या ताफ्यामुळे प्रभावीपणे मात करता येणार आहे. पुढील सहा महिन्यांत सुमारे पाच हजारांहून अधिक जुन्या बसेस प्रवासी सेवेतून कालबाह्य होणार आहेत.
एसटी महामंडळाने यापूर्वीच बसताफ्याच्या आधुनिकीकरणाला सुरुवात केली आहे. २ बाय २ आसन व्यवस्थेच्या २,६४० ‘लालपरी’ बसेस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. त्याचबरोबर ३ बाय २ आसन व्यवस्थेच्या तीन हजार ‘राजमाता जिजाऊ’ बसेस ताफ्यात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नव्या बसेसच्या समावेशामुळे एसटीचा ताफा अधिक तरुण, सक्षम आणि प्रवाशांच्या गरजांशी सुसंगत होत आहे.
नव्या पाच हजार बसेस ताफ्यात दाखल झाल्यानंतर ‘मागेल त्याला बसफेरी’ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बसफेरीचा फायदा झाला नाही तरी चालेल; मात्र बसफेरीची मागणी करणाऱ्यांनी ती फेरी तोट्यात चालणार नाही, याची हमी घ्यावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
विशेष म्हणजे, पाच हजार ‘लालपरी’ बसेसचा हा टप्पा एसटीच्या पारंपरिक डिझेल बसच्या युगातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. यानंतर पर्यावरणपूरक ई-बसेसच्या दिशेने एसटी महामंडळाचा प्रवास अधिक वेगाने सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आधुनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देतानाच पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य मिळणार आहे. लाखो नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाची विश्वासू सोबती असलेल्या एसटीच्या ताफ्यात होणारी ही मोठी भर म्हणजे केवळ बसेसची संख्या वाढविणे नव्हे, तर प्रवाशांच्या सुरक्षित, सुखकर आणि दर्जेदार प्रवासाला नवी दिशा देणारे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद अधिक प्रभावीपणे साकार करण्यासाठी एसटी आता नव्या दमाने, नव्या तंत्रज्ञानासह आणि पर्यावरणपूरक भविष्यासाठी सज्ज होत आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
0000

WhatsApp