पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे
मुंबई, दि. १: पुणे शहरातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांमुळे मुठा नदीचे प्रदूषण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे बैठक घेऊन नदी पुनर्जीवन प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तसेच आरएमसी प्रकल्पांच्या प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर सातत्याने कारवाई केली जात असून, यापुढेही नियमित बैठका घेऊन परिस्थितीवर लक्ष ठेवले जाईल, असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
यासंदर्भात विधानपरिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील चर्चेत डॉ. नीलम गोऱ्हे, प्रवीण दरेकर आणि विक्रम काळे यांनी सहभाग घेतला.
पर्यावरण मंत्री मुंडे म्हणाल्या की, पुण्यातील १०५ आरएमसी प्रकल्पांपैकी सर्व प्रकल्प बंद करण्यात आलेले नसून, केवळ नियमांचे पालन न करणारे, बेकायदेशीरपणे कार्यरत किंवा प्रदूषण नियंत्रणाच्या अटींचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवरच कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आरएमसी प्रकल्पांसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानुसार सर्व प्रकल्पांना बंदिस्त (बॉक्स कव्हर) व्यवस्था, धूळ नियंत्रणासाठी स्प्रिंकलर, वाहनांच्या टायर धुण्याची व्यवस्था आणि इतर प्रदूषण नियंत्रण उपाययोजना बंधनकारक करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कारवाई केली जाईल. मुठा नदीच्या प्रदूषणासाठी केवळ आरएमसी प्रकल्पच जबाबदार नसून सांडपाणी हेही मोठे कारण असल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, नदी प्रदूषण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एसटीपी उभारण्याचे काम सुरू आहे. पाण्याच्या गुणवत्तेचे ऑनलाईन निरीक्षणही करण्यात येत आहे, असेही मंत्री मुंडे यांनी नमूद केले.
पर्यावरण विभागाकडून प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना वेळोवेळी नोटिसा दिल्या जात असून, नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच प्रदूषण नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी उद्योगांच्या बँक गॅरंटीची रक्कम वाढविण्याबाबत समितीमार्फत धोरण तयार करण्यात येत असून, अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असलेले व्यापक धोरणही तयार करण्यात येत असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले.
00000
मोहिनी राणे/स.सं.
ठाणे जिल्ह्यातील रेड व ऑरेंज झोनमधील उद्योगांबाबत बैठक घेणार – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे
मुंबई, दि. १: ठाणे जिल्ह्यात रेड आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील रेड व ऑरेंज झोनमधील उद्योगांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या प्रश्नांवर लवकरच बैठक घेण्यात येईल असे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबत सदस्य सुनील शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य प्रमोद जठार, अनिल परब, ज्ञानेश्वर म्हात्रे, भाई जगताप यांनी उपप्रश्न उपस्थित केले.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, वाढत्या प्रदूषणाच्या तक्रारींची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) मध्ये मनुष्यबळ वाढविण्याची प्रक्रिया सुरू असून, आवश्यकतेनुसार नियमित व कंत्राटी पदांवर भरती केली जाणार आहे. प्रदूषणाबाबत जनजागृती वाढल्यामुळे तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्यासाठी सध्या उपलब्ध कर्मचारी अपुरे पडत असून, एमपीसीबीमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही सुरू आहे.
बँक गॅरंटीच्या संदर्भात कोणताही गैरप्रकार आढळलेला नसल्याचे सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि खाते ते खात्याद्वारे होत असल्याने अनियमिततेची बाब निदर्शनास आलेली नाही.
कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (सीईटीपी) ही व्यवस्था सहकार विभागाऐवजी एमआयडीसीमार्फत चालविली जाते. लहान आणि मध्यम उद्योगांना स्वतंत्र सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्यामुळे सामूहिक प्रक्रिया केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये हीच पद्धत राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. समित्यांच्या सुनावण्या अधिक पारदर्शक करण्यासाठी त्या ऑनलाइन किंवा इन-कॅमेरा पद्धतीने घेण्याबाबतही सकारात्मक विचार करण्यात येईल, असे मंत्री मुंडे यांनी यावेळी सांगितले.
0000
शैलजा पाटील/विसंअ
व्हीआयपी दर्शनातील गैरप्रकार व सुरक्षा रक्षक-भाविक वाद प्रकरणाची चौकशी सुरू – राज्यमंत्री आशिष जयस्वाल
मुंबई, दि.१: नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी दर्शनासंदर्भातील गैरप्रकार आणि सुरक्षा रक्षक व भाविक यांच्यात झालेल्या वादाच्या दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी सुरू असून, अहवालानुसार दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य सुनील शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य भावना गवळी, प्रविण दरेकर, किशोर दराडे यांनी उपप्रश्न उपस्थित केले.
राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले, त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांशी सौजन्यपूर्ण आणि सन्मानपूर्वक वर्तन सुनिश्चित करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिरातील दर्शन व्यवस्था अधिक सुसूत्र करण्यात आली आहे. ऑनलाइन पोर्टलद्वारे दररोज सुमारे दोन हजार भाविकांना, तर ऑफलाइन व्यवस्थेद्वारे सुमारे सात हजार भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तातडीच्या दर्शनासाठी निर्धारित शुल्क आकारून विशेष पासची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. मंदिर परिसरात शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने दर्शन व्यवस्था राबविण्यासोबतच भाविकांना सन्मानाची वागणूक मिळावी, यासाठी प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करणार असल्याचेही राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
0000
शैलजा पाटील/विसंअ






















WhatsApp