मुंबई, दि. २९ : चंद्रपूर जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली निर्मल भवन येथील एमएसआरडीसी कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीत कृषी पंपांना वीजजोडणी, बल्लारपूर येथे ईएसआयसी रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून देणे, विदर्भ व मराठवाडा वीज प्रोत्साहन योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा तसेच चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील ८०० मेगावॅट संच कार्यान्वित करण्यासंदर्भातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस आमदार सुधीर मुनगंटीवार, महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय औंढीकर, राज्य कर्मचारी विमा महामंडळाचे संचालक डॉ. अशोक थोरात;तसेच महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत या दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या.
बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील १,७४० प्रलंबित कृषी पंपांना तातडीने वीजजोडणी उपलब्ध करून देण्याबाबत विशेष चर्चा करण्यात आली. यासंदर्भात सौर ऊर्जेच्या अनुषंगाने येत्या दहा दिवसांत आवश्यक तपासणी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. बल्लारपूर येथे ईएसआयसी रुग्णालय, राज्य राखीव पोलीस दलाची वसाहत तसेच महिला सहकारी औद्योगिक वसाहतीसाठी विसापूर येथील ३१.३५ हेक्टर क्षेत्रफळाच्या बंद पॉवर हाऊसची जागा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
स्वतंत्र विदर्भ क्षेत्र वीज प्रोत्साहन योजनेसाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या ₹५५० कोटींच्या तरतुदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. संबंधित समिती सखोल अभ्यास करून शासनास अहवाल सादर करणार आहे. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील ८०० मेगावॅट क्षमतेचा संच कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठविण्यात आला असून, तो लवकरच मार्गी लागेल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या वसाहतीतील रस्ते, नाले, निवासस्थाने, गाळे तसेच स्विमिंग पूल आणि व्यायामशाळेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. वसाहतीतील एकूण ५३० इमारतींपैकी १४३ इमारतींचे नूतनीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे.
यावेळी ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित सर्व प्रलंबित प्रश्नांचा प्राधान्याने पाठपुरावा करून ते वेळेत मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून विविध विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
००००
गजानन पाटील/विसंअ






















WhatsApp