रायगड-अलिबाग, दि.१९: रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी माझी नियुक्ती केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि संपूर्ण महायुती सरकारचे मी मनापासून आभार मानतो. आतापर्यंत मंत्री म्हणून मी माझे कर्तव्य पार पाडतच होतो परंतु आता रायगड जिल्ह्याच्या जनतेसाठी अधिक जबाबदारीने काम करून पालकमंत्री पदाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार, अशा शब्दात रोजगार हमी मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रायगड ही माझी मायभूमी आणि कर्मभूमी आ़़हे. या जिल्ह्याच्या मातीत वाढलो, इथल्या जनतेने मला प्रेम दिले, विश्वास दिला आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली.
आज महाड-माणगाव-पोलादपूर मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून काम करत असताना संपूर्ण रायगड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून सेवा करण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. या पदावर अधिक जबाबदारीने काम करून या पदाला न्याय देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल.
छत्रपती शिवरायांच्या पुण्य व पावन पवित्र भूमीचा भूमिपुत्र आणि शिवरायांचा मावळा म्हणून रायगडच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून रायगडच्या प्रत्येक तालुक्याचा, प्रत्येक गावाचा आणि प्रत्येक नागरिकाचा विकास झाला पाहिजे, यासाठी सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे काम करीन.
आजपर्यंत महाड-माणगाव-पोलादपूर मतदारसंघातील जनतेने आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या माझ्या शिवसैनिकांनी मला जी साथ दिली, त्याबद्दल मी त्या सर्वांचा मनापासून आभारी आहे. आता हीच साथ आणि आशीर्वाद संपूर्ण रायगडच्या विकासासाठी घेऊन पुढे जायचे आहे.
माझ्यासाठी पालकमंत्रीपद हे केवळ पद नाही, तर रायगडच्या जनतेची सेवा करण्याची मोठी संधी आहे, जबाबदारी आहे. पदाबरोबर जबाबदारी येते आणि जबाबदारीसोबत कर्तृत्व सिद्ध करण्याची संधीही मिळते. आज रायगडच्या विकासाची ही संधी मला मिळाली आहे. या संधीचे नक्कीच सोने करीन, अशा शब्दात पालकमंत्री गोगावले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
००००









WhatsApp