Home क्रीडा ICC World Cup 2019 : तब्बल 27 वर्षांनी रचला इंग्लंडने इतिहास, 1992 नंतर केली ‘ही’ गोष्ट

ICC World Cup 2019 : तब्बल 27 वर्षांनी रचला इंग्लंडने इतिहास, 1992 नंतर केली ‘ही’ गोष्ट

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यजमान इंग्लंडने न्यूझीलंड विजय मिळवत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. विजयानंतर इंग्लंडने जवळपास 27 वर्षांनी एक इतिहास रचला आहे. इंग्लंडने 1992 साली विश्लचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर मात्र इंग्लंडला आतापर्यंत विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करता आला नव्हता. त्यामुळे जवळपास 27 वर्षांनी इंग्लंडचा संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दाखल झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

विजय इंग्लंडचा, पण बँड वाजला पाकिस्तानचा
न्यूझीलंडविरुद्धच्या सा़मन्यात इंग्लंडने विजय मिळवत उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. पण इंग्लंडच्या विजयाने पाकिस्तानचा चांगलाच बँड वाजल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण आता पाकिस्तानच्या संघाचे विश्वचषकातील आव्हान जवळपास संपुष्टात आले असल्याचे म्हटले जात आहे.

हा सामना जर न्यूझीलंडने जिंकला असता आणि पाकिस्तान पराभूत झाला असता तर पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकला असता. कारण या सामन्यापूर्वी इंग्लंडचे 10 गुण होते. त्यामुळे इंग्लंड पराभूत झाला असता तर त्यांचे 10 गुणच राहिले असते. त्यानंतर जर पाकिस्तानने बांगलादेशवर विजय मिळवला असता तर त्यांना 11 गुणांसह उपांत्य फेरी गाठता आली असती. पण आता इंग्लंडच्या विजयाने पाकिस्तानचे उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न बेचिराख होण्याच्या मार्गावर आहे.

न्यूझीलंडवर विजय मिळवत इंग्लंड उपांत्य फेरीत दाखल
न्यूझीलंडवर 119 धावांनी दणदणीत विजय मिळवत इंग्लंडने उपांत्य फेरीत दिमाखा प्रवेश केला आहे. इंग्लंडने न्यूझीलंडपुढे विजयासाठी 306 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 186 धावांवर आटोपला आणि इंग्लंडने विजयासह उपांत्य फेरी गाठली.

सलामीवीर जॉनी बेअरस्टोवने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावत चांगला पाया रचला. पण यावर साजेसा कळस मात्र इंग्लंडच्या फलंदाजांना चढवता आला नाही. बेअरस्टोव बाद झाल्यावर इंग्लंडचे फलंदाज एकामागून एक धारातीर्थी पडत गेले आणि त्यांना न्यूझीलंडपुढे 306 धावांचे आव्हान ठेवता आले. बेअरस्टोव खेळत असताना इंग्लंड चारशे धावांच्या जवळपास जाईल, असे वाटत होते.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य असल्याचे जॉनी बेअरस्टोव आणि जेसन रॉय यांनी दाखवून दिले. या दोघांनी इंग्लंडसाठी 123 धावांची सलामी दिली. रॉयच्या रुपात इंग्लंडला पहिला धक्का बसला. रॉयने आठ चौकारांच्या जोरावर 61 धावांची खेळी साकारली.

रॉय बाद झाल्यावरही बेअरस्टोवने दमदार फटकेबाजी सुरुच ठेवत या सामन्यातही शतक झळकावले. भारताविरुद्धच्या गेल्या सामन्यातही बेअरस्टोवने शतक झळकावले होते. बेअरस्टोवचे हे सलग दुसरे शतक ठरले. या सामन्यात बेअरस्टोवने 15 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 106 धावांची खेळी साकारली. शतक झळकावल्यावर मात्र बेअरस्टोवला जास्त धावा करता आल्या नाही. बेअरस्टोव बाद झाल्यावर इंग्लंडचा डाव गडगडायला सुरुवात झाली. बेअरस्टोव बाद झाला तेव्हा इंग्लंडची 31.4 षटकांत 3 बाद 206 अशी स्थिती होती. त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करल्याचे पाहायला मिळाले.