नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत आता सेमीफायनल सामने होणार असून उद्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सेमीफायनलचा सामना होणार असून या सामन्यावर पावसाचे संकट घोंघावत आहे. याआधी साखळी सामन्यांमधील देखील या दोन संघांमधील सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. त्यावेळी दोन्ही संघाना एक एक पॉईंट देण्यात आला होता. मात्र सेमीफायनलच्या दिवशी देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या सामन्यांसाठी आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. मात्र त्यादिवशी देखील जोरदार पाऊस पडणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिल्याने भारतीय चाहत्यांना धक्का बसला आहे. सामन्याच्या पूर्ण दिवसभर पाऊस पडणार असल्याचे वातावरण दिसत आहे.
कुणाला बसणार फटका
जर दोन्हीही दिवशी पाऊस पडला तर याचा सर्वात जास्त फटका कुणाला बसणार याची सध्या चर्चा सुरु आहे. त्यामुळे या दोन संघांपैकी कोण सेमीफायनलला जाणार यावर सोशल मीडियावर देखील चर्चा सुरु आहे. साखळी सामन्यांमध्ये ज्याने चांगले प्रदर्शन केले आहे त्याचा उपयोग या संघाना याठिकाणी होऊ शकतो. यामुळे पाऊस पडला तरीदेखील भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचणार आहे.
साखळी सामन्यांत गुणतालिकेत सर्वात वर
स्पर्धेच्या साखळी सामन्यांत भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर होता. यामध्ये भारताने ९ सामन्यांमध्ये ७ सामन्यांत विजय मिळवला असून एका सामन्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचबरोबर न्यूझीलंडला ९ पैकी ५ साखळी सामन्यांत विजय मिळवता आला असून ३ सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे सामना पावसामुळे रद्द झाला तरी भारतीय संघ गुणतालिकेत वरच्या स्थानावर असल्याने थेट फायनलमध्ये जागा मिळू शकते.