मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाला अनपेक्षित वळण लागले असून आज सकाळीच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा शपथ घेतली. तर धक्कादायक म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी वेगळेच वळण घेतले आहे. हे एका रात्रीत घडलेले असल्याचे समजत आहे.
24 ऑक्टोबरला निकाल लागला. तेव्हापासून आतापर्यंत कोणीही सरकार बनवू शकले नाही. महाराष्ट्रासमोर मोठी संकटे आहेत. शेतकऱ्यांवर संकट आले आहे. या समस्या सोडविण्यासाठी व निर्णय वेगवान करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. गेले एक महिनाभर चर्चा काही संपतच नव्हती. मार्ग निघत नव्हता. नको त्या मागण्या पुढे येत होत्या. हे पाहता आताच अशा समस्या येत असतील तर हे तीन पक्षांचे सरकार पुढे कसे टिकणार. यामुळे मी निर्णय घेतला, असे अजित पवार यांनी सांगितले.
काल रात्री काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक फिस्कटली होती. यानंतर मध्यरात्री साडेबारा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघे राज्यपालांना भेटले. एक वाजता राज्यपालांनी केंद्राकडे शिफारस केली. राष्ट्रपती राजवट हटवण्याची सकाळी सातची शपथविधीची वेळ ठरली. काँग्रेस शिवसेनेला बाजूला ठेवून भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले. यात प्रफुल्ल पटेल यांनी मोठी भुमिका बजावली आहे.
शरद पवार अनभिज्ञ?
शरद पवार साहेबांना सुरुवातीच्या काळात या गोष्टी माहित्या होत्या. परंतू नंतरच्या काळामध्ये; पहिल्या काळात त्यांना मी स्थिर सरकार देण्याबाबत सांगत होतो. कोणीतरी दोघांनी किंवा तिघांनी एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नव्हते. या आधीही काँग्रेस, राष्ट्रवादीने स्थिर सरकार दिले आहे. शिवसेना-भाजपाने स्थिर सरकार दिले आहे, असे अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर सांगितले.
तर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी, शिवसेनेला दोष देताना जनादेशाला त्यांनी नाकारले. राज्यात तीन पक्षांचे सरकार आले तर ते टिकेल की नाही याबाबत माहिती नाही. यामुळे अजित पवारांशी संपर्क साधला आणि स्थिर सरकार देण्याची चर्चा केली. अजित पवारांना शुभेच्छा, असे सांगितले.






















WhatsApp