मुंबई : पुणे येथील कोंढवा परिसरात भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये परराज्यातील मजुरांचा समावेश होता. सोसायटीतील नागरिकांनी महापालिका आणि पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. मात्र याकडे दुर्लक्ष का केलं गेलं? वेळीच या तक्रारीची दखल घेतली असती तर कदाचित ही घटना घडली नसती. त्यामुळे निष्काळजीपणा करणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विधानसभेत अजित पवार यांनी केली आहे.
यावेळी विधानसभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, या मजुरांची नोंद नसल्याने मृत मजुरांना मदत करताना अडचण होतेय मग बांधकाम व्यावसायिकांनी मजुरांच्या नावाची नोंद का केली हा प्रश्न आहे. पार्किंगसाठी इमारतींमध्ये बेसमेंट तयार केले जातात. त्यामुळे इतर बांधकामाला धोका पोहचतो चुकीच्या पद्धतीने काम करणारे, करोडो रुपये कमविणारे बांधकाम व्यावसायिकांवर चाप बसवण्यासाठी सरकारने कठोर निर्णय घेण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितले. अशा घटना घडल्यानंतर काही काळ चर्चा होते पुन्हा त्याकडे दुर्लक्ष होऊन प्रकरण शांत होते. अशा घटनांमध्ये कारवाई कितपत होते हेही कळत नाही असंही अजित पवार म्हणाले.

तसेच या मुद्द्यावर बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, कोंढवा परिसरात अशी अनेक बांधकाम सुरु आहेत ज्यामुळे परिसरातील नागरिकांच्या जीवाला धोका आहे. या बांधकाम व्यावसायिकांना काळ्या यादीत टाकावं. या गरिबांना न्याय देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे अशी मागणी त्यांनी केली.

शुक्रवारी रात्री 1.30 च्या सुमारास कोंढवा भागातील आल्कन स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत कोसळून 15 जणांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला होता. कांचन डेव्हलपर्सच्या पंकज व्होरांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आल्कन स्टायलस उभारणाऱ्या चौघांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी आल्कन स्टायलस इमारत उभारणारे बांधकाम व्यावसायिक विपुल अगरवाल आणि विवेक अगरवाल यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने 2 जुलै पर्यंत आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.






























WhatsApp