‘टाईमलाईन’ समाजात सकारात्मकता पेरणारे पुस्तक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘टाईमलाईन’ समाजात सकारात्मकता पेरणारे पुस्तक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- Advertisement -


मुंबई, दि 6 : टाईमलाईन हे पुस्तक समाजमाध्यमावरील पोस्टसचे संकलन आहे. मात्र यामध्ये नकारात्मक विचार शोधूनही आढळणार नाही. टाईमलाईन हे समाजमनात सकारात्मकता पेरणारे पुस्तक असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

रविंद्र नाट्यमंदिर येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे लोकमत समूहाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांच्या ‘टाईमलाईन’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर,  गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर, दिग्दर्शक मधुर भांडारकर, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. अमित मायदेव, सुलेखनकार अच्युत पालव व विजय दर्डा हे उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकमत समूहाचे एडिटर-इन-चीफ श्री राजेंद्र दर्डा यांनी याआधीही झुंबर, माझी भिंत यासारखी विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तके लिहिली आहेत. नकारात्मकतेने ग्रासून टाकणाऱ्या जगातही सकारात्मक राहता येते हे शिकवणारे हे पुस्तक आहे. बदलत्या काळानुसार आपण सुसंगत राहिले पाहिजे हे त्यांनी या पुस्तकातून आवर्जून सांगितले आहे. लोकमत समूहही काळाबरोबर चालत आहे. राजेंद्र दर्डा यांनी लिहिलेल्या पोस्ट आजही सुसंगत आहेत. समाजमाध्यमे ही अभिव्यक्तीची साधने झाली आहेत हे खरे, पण स्वातंत्र्याचा स्वैराचार होता कामा नये यासाठी समाजमाध्यमाची आचारसंहिता सर्वानीच पाळणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, समाजातील सर्व स्तरातील लोकांची अभिव्यक्ती या पुस्तकाच्या माध्यमातून पहावयास मिळते. या पुस्तकात आत्मपरीक्षणही पहावयास मिळते. हे पुस्तक नव्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार म्हणाले, साहित्य, संस्कृती, कला, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहे. टाईमलाईन हे पुस्तक समाजमाध्यमाची ताकद दर्शविणारे आहे. नव्या  धाटणीचे हे पुस्तक समाजमाध्यमाला दिशा देणारे आहे. समाजमाध्यमावरील लेखनाचे मार्गदर्शन या पुस्तकात मिळते असेही सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. शेलार यांनी सांगितले.

लोकमत समूहाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा मनोगतात म्हणाले, सोशल मीडिया या माध्यमाशी मी स्वतःला जोडून घेतले. नवीन पिढीशी जोडला गेल्याचा आनंद वाटतो. या माध्यमात मी कटुता टाळली. सकारात्मकता जपली. टाईमलाईनमधील घटना प्रेरणा देणा-या आहेत. समाजासाठी काम करणाऱ्यांवर मी लिहिले असल्याचेही श्री.दर्डा यांनी सांगितले.

यावेळी महापौर रितू तावडे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, भाई जगताप, संगीतकार अनु मलिक, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, रामदास भटकळ, सुरेश जैन, संजय राऊत, कृपाशंकर सिंह व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. रेखा प्रकाशनचे हेमराज शहा हे देखील यावेळी उपस्थित होते.

००००



Source link

- Advertisement -