जुलै २०२६ अखेर ९१ टक्के पात्र मातांना आयर्न सुक्रोज/फेरिक कार्बोक्सि माल्टोज इंजेक्शनचे उपचार
मुंबई, दि. 26 : गर्भधारणा हा स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असून योग्य आहार व देखरेखीद्वारे माता व नवजात शिशुचे आरोग्य राखणे आवश्यक आहे. भारतात अंदाजे ५२ टक्के गर्भवती महिलांमध्ये रक्तक्षय आढळून येतो. रक्तक्षयामुळे प्रसूतीदरम्यान/नंतर मातेच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. तीव्र रक्तक्षय हे माता व नवजात शिशु मृत्यूचे एक महत्त्वाचे कारण आहे. हीच समस्या दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार २०१५ मध्ये आरोग्य विभागाला आयर्न सुक्रोजच्या माध्यमातून ॲनिमियावरील उपचार राबविण्याचे निर्देश दिले होते. यामुळे राज्यातील गरोदर मातांचे आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनात विभागाने तीव्र रक्तक्षयावरील मोफत उपचारांना गती दिली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंतच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आयर्न सुक्रोजचा सिद्ध आणि परिणामकारक उपचार पोहोचविण्यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण तसेच दुर्गम भागातील गरोदर मातांनाही तीव्र रक्तक्षय विशेष उपचार सुविधा उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली मातृ व बाल आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग कार्यरत आहे. तीव्र रक्तक्षयग्रस्त गरोदर मातांना वेळेत उपचार, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि सक्षम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या या प्रयत्नांमुळे सुरक्षित मातृत्वाचा पाया अधिक भक्कम होत आहे.
तीव्र रक्तक्षयावर आयर्न सुक्रोज तसेच फेरीक कार्बोक्सी माल्टोज (एफसीएम) या औषधांद्वारे शिरेवाटे उपचार सुविधा राज्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. एचएमआयएस अहवालानुसार चालू वर्षात (२०२६-२७ जुलैअखेर) नोंद झालेल्या एकूण मातांपैकी तपासणीअंती २३५२४ गरोदर मातांची तीव्र रक्तक्षय असलेल्या अतिजोखमीच्या माता म्हणून निदान झाले आहे. त्यापैकी २१३३७ मातांना आयर्न सुक्रोज किंवा फेरीक कार्बोक्सी माल्टोज (एफसीएम) द्वारे उपचार देण्यात आले असून उपचाराचे प्रमाण ९१ टक्क्यांवर पोहोचले आहे.
तपासणी-निदान-उपचार-पुनर्तपासणीवर भर (Four T Strategy)
गरोदरपणातील तीव्र रक्तक्षयामुळे माता आणि गर्भाच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे या समस्येचे वेळीच निदान करून उपचार देणे, उच्च जोखमीच्या मातांचा सातत्याने पाठपुरावा करणे आणि उपचारानंतर पुनर्तपासणी करणे यावर राज्य शासनाने विशेष भर दिला आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणेमार्फत ‘तपासणी-निदान-उपचार-पुनर्तपासणी’ही साखळी अधिक परिणामकारक करण्यासाठी (Four T Strategy Test, Talk, Treat, Track ) नियोजनबद्ध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ‘अॅनिमिया मुक्त भारत अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सन २०१८-१९ पासून प्राथमिक आरोग्य केंद्रे व त्यावरील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तीव्र रक्तक्षयग्रस्त गरोदर मातांना आयर्न सुक्रोज इंजेक्शनद्वारे उपचार देण्यात येत होते. सन २०२४-२५ पासून राज्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये आयर्न सुक्रोजसोबत, अधिक प्रभावी असलेले इंजेक्शन फेरीक कार्बोक्सी माल्टोजही उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे उपचारांचे पर्याय वाढले असून पात्र मातांना गरजेनुसार जलद व प्रभावी सेवा देणे शक्य झाले आहे.
उपचार पद्धतीचा प्रभावी आणि सुरक्षित वापर व्हावा, यासाठी जानेवारी २०२६ मध्ये राज्यस्तरावर वैद्यकीय अधिकारी व संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांचे ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यात आले. तसेच औषधांचा पुरेसा साठा, वेळेत संदर्भ सेवा आणि उच्च जोखमीच्या गरोदर मातांची स्वतंत्र नोंद ठेवून उपचार पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करण्याचे आरोग्य विभागांकडून नियोजन करण्यात आले आहे. या वर्षात जिल्हानिहाय कामगिरीत अनेक जिल्ह्यांनी उल्लेखनीय प्रगती नोंदविली आहे. अहिल्यानगर, लातूर, बीड, चंद्रपूर, वर्धा, रत्नागिरी, वाशिम व बुलढाणा या जिल्ह्यात १०० टक्के तीव्र रक्तक्षयाच्या मातांना उपचार देण्यात आले आहेत. नागपूर, सिंधूदूर्ग, गोंदिया, छत्रपती संभाजीनगर, पुणे, हिंगोली, जालना, धाराशिव व ठाणे या जिल्ह्यांनी ९५ ते १०० टक्क्यांपर्यंत तीव्र रक्तक्षयाच्या मातांना उपचार देऊन साध्य पूर्ण केले आहे. ही कामगिरी राज्यातील मातृ आरोग्य यंत्रणेची तत्परता आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे शक्य होत आहे.
महानगरपालिका क्षेत्रातही उपचार सेवा प्रभावीपणे पोहोचत आहे. लातूर, नाशिक, भिवंडी, कोल्हापूर, उल्हासनगर, नांदेड-वाघाळा, नवी मुंबई, सोलापूर, चंद्रपूर, परभणी व सांगली-मिरज कुपवाड या क्षेत्रांमध्ये उपचारांचे प्रमाण १०० टक्के आहे. इतर सर्व महानगरपालिका क्षेत्रांमध्ये पात्र मातांपर्यंत उपचार वेळेत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र पाठपुरावा करण्यात येत आहे. उपचारांचे प्रमाण तुलनेने कमी असलेल्या नंदुरबार, सोलापूर, गडचिरोली, पालघर, नाशिक आणि भंडारा या जिल्ह्यांसाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. या भागांमध्ये जिल्हानिहाय उद्दिष्टे निश्चित करून आशासेविका, आरोग्यसेविका, वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत उपचार कव्हरेज वाढविण्यावर भर दिला जात आहे. शिवाय सार्वजनिक आरोग्य विभागाने तीव्र रक्तक्षय असलेल्या सर्व गर्भवती महिलांना त्यांच्या हिमोग्लोबिनची पातळी वाढविण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आयर्न सुक्रोज/फेरिक कार्बोक्सि माल्टोज इंजेक्शन देण्यासाठी जानेवारी 2026 ते मार्च 2026 अखेर विशेष मोहीम राबविली आहे. गरोदर मातांवर रक्तक्षयाचे उपचार नेहमी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखालीच करावी लागतात.
गर्भधारणेची नोंद होताच प्रत्येक महिलेची हिमोग्लोबिन तपासणी, आयर्न-फॉलिक अॅसिडच्या नियमित सेवनाबाबत समुपदेशन, पोषक व लोहयुक्त आहाराची माहिती आणि आवश्यकतेनुसार तज्ज्ञांकडे संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. एचएमआयएस अहवालाच्या माध्यमातून जिल्हा व तालुकानिहाय तपासणी, निदान आणि उपचाराच्या प्रगतीचे नियमित विश्लेषण केले जात आहे.
आयर्न सुक्रोजचे / फेरिक कार्बोक्सि माल्टोज इंजेक्शनचे फायदे
- रक्तातील हिमोग्लोबिन आणि शरीरातील लोहाचा साठा वेगाने वाढवण्यास मदत होते.
- रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा सुधारल्याने ऊर्जा मिळते. मरगळ व थकवा कमी होतो.
- तोंडाव्दारे देण्यात आलेल्या आयर्न (लोहयुक्त) गोळ्यांमुळे होणारा मळमळ किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास या इंजेक्शनमुळे टाळता येतो.
- गर्भधारणा व किडनीच्या आजारात याचा उपयोग चांगला होत आहे. तीव्र अशक्तपणा किंवा दीर्घकालीन मूत्रपिंडाच्या आजाराच्या (CKD)RELATED समस्या असलेल्या महिलांवर उपचारासाठी आयर्न सुक्रोज फायदेशीर आहे.
- या उपचार पद्धतीमुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढवून अकाली प्रसूती, प्रसूती दरम्यान/नंतर रक्तस्त्राव, माता मृत्यू यासारख्या समस्या कमी होण्यास मदत होते.
संकलन – धोंडिराम अर्जुन, विभागीय संपर्क अधिकारी









WhatsApp