
- ४,२५० कोटींच्या ‘प्रगती’ प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
मुंबई, दि. ८ : महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण, सुलभ आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी राज्य सरकारने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘प्रगती’ (प्राथमिक आरोग्यसेवेची नव्याने उभारणी, प्रगत प्रशासन आणि सुलभ तंत्रज्ञानाचा समन्वय) या राज्यस्तरीय सार्वजनिक आरोग्य सुधारणा प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पामुळे आरोग्य सेवांचा विस्तार, गुणवत्तावाढ आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांना गती मिळणार आहे. पाच जिल्ह्यांत जिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होणार असल्याने १,६०० खाटांची वाढ अपेक्षित असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
२०२६ ते २०३१ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ४,२५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये आशियाई विकास बँकेकडून ७० टक्के म्हणजे सुमारे २,९७५ कोटी रुपये कर्ज, तर ३० टक्के म्हणजे १,२७५ कोटी रुपये राज्य शासनाचा हिस्सा राहणार आहे.
पाच जिल्ह्यांत १,६०० खाटांची वाढ
‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत पाच जिल्ह्यांतील रुग्णालयांना मोठी बळकटी देण्यात येणार आहे. कोल्हापूर आणि नांदेड येथे प्रत्येकी ५०० खाटांची नवीन जिल्हा रुग्णालये, पुणे येथे २०० खाटांचे संदर्भसेवा रुग्णालय, तर लातूर आणि नागपूर येथील प्रत्येकी २०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. या माध्यमातून एकूण १,६०० खाटांची क्षमता वाढणार असून, त्यासाठी अंदाजे १,५०० कोटी रुपयांचा भांडवली खर्च अपेक्षित आहे. जिल्हास्तरावरच निदान, उपचार आणि संदर्भ सेवा उपलब्ध झाल्याने तृतीय स्तरावरील रुग्णालयांवरील अनावश्यक भार कमी होण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
असंसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंधाला प्राधान्य
‘प्रगती’ प्रकल्पात असंसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंध, तपासणी, निदान आणि उपचाराला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, दीर्घकालीन मूत्रपिंडविकार, दीर्घकालीन फुफ्फुसविकार, पक्षाघात, मानसिक आरोग्य, मधुमेहामुळे होणारे डोळ्यांचे विकार, यकृतातील चरबी वाढणे, वेदनाशामक उपचार आणि जीवनाच्या अखेरच्या टप्प्यातील सेवांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. त्याचबरोबर आरोग्य तपासणी, समुपदेशन, जनजागृती, आरोग्यविषयक वर्तनातील सकारात्मक बदल आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौशल्यवर्धन यावर भर दिला जाणार आहे. स्तन, गर्भाशयमुख आणि तोंडाच्या कर्करोगाच्या तपासणी व निदान सुविधा अधिक सक्षम करण्यात येणार असून, कर्करोगाचे वेळेत निदान आणि उपचारासाठी आवश्यक तंत्रज्ञान व मनुष्यबळाला बळकटी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डिजिटल आरोग्यसेवांना मिळणार गती
‘महाराष्ट्र आरोग्य तंत्रज्ञान अभियान’च्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनाला गती देण्यात येणार आहे. डिजिटल आरोग्य नोंदी, आरोग्य माहिती प्रणालींचे एकत्रीकरण, दूरस्थ वैद्यकीय सल्ला आणि विविध तंत्रज्ञानाधारित सेवांचा विस्तार करण्यात येणार आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आरोग्य सेवा नागरिकांच्या अधिक जवळ पोहोचविणे, विविध स्तरांवरील सेवांमध्ये समन्वय वाढविणे आणि रुग्णाला सातत्यपूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, हा प्रकल्पाचा महत्वाचा उद्देश आहे.
‘प्रगती’ प्रकल्पामुळे आरोग्य सेवेचा चेहरामोहरा बदलणार असून, नागरिकांना अधिक सुलभ, गुणवत्तापूर्ण आणि एकात्मिक आरोग्य सेवा मिळण्यास मोठी मदत होणार असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. असंसर्गजन्य आजार आणि कर्करोगाचे वेळेत निदान, उपचार व पाठपुरावा, मानसिक आरोग्य, जीवनाच्या अखेरच्या टप्प्यातील सेवा, डिजिटल आरोग्य आणि रुग्णांच्या सातत्यपूर्ण उपचार व्यवस्थेला या प्रकल्पातून बळ मिळणार आहे.
आरोग्य सेवांचे एकत्रीकरण, तंत्रज्ञानाचा वापर आणि व्यवस्थापनातील सुधारणा यामुळे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेची कार्यक्षमता वाढणार आहे. तसेच नागरिकांचा आरोग्यावरील स्वखर्च कमी करण्यास आणि सर्वांसाठी आरोग्यसेवा या उद्दिष्टाला चालना मिळणार आहे.
0000
धोंडिराम अर्जुन/विसंअ

WhatsApp