देशातील सर्वात मोठी सोलर इकोसिस्टीम नागपुरात; उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    - Advertisement -

    नागपूर दि. 21: देशातील सर्वात मोठी सोलर मॉडेल इकोसिस्टीम नागपूर येथे आकार घेत आहे. येत्या दहा वर्षात नागपूर हे ‘सोलर इकोसिस्टीम’चे हब होणार आहे, त्यामुळे उद्योजकांनी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील अवादा समूहाला  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली तसेच सोलर मॉडेल निर्मितीची  पहाणी केली, त्यानंतर उद्योजकांशी संवाद साधला.

    अवादा उद्योग समूहाचे संस्थापक व अध्यक्ष विनीत मित्तल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत घेतली, यावेळी  राज्यातील पायाभूत सुविधा औद्योगिक विकास आणि मुंबईच्या भविष्यातील बदलांवर उद्योजकांसोबत मुख्यमंत्री यांनी संवाद साधला.

    नवीन नागपूरच्या प्रकल्पाविषयी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, येथे स्मार्ट इंडस्ट्रीसाठी इकोसिस्टीम तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी पन्नास टक्के पेक्षा अधिक जागा अधिकृत झाली असून गुंतवणुकीलाही प्रोत्साहन मिळत आहे. देशातील पहिले सोलर मॉडेल अतिरिक्त बुटीबोरी क्षेत्रात तयार होत असून अवदासमूहाला त्यांच्या प्रकल्पाच्या विस्तारासाठी 250 एकर जागेची आवश्यकता आहे. ती देण्याची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केली. अतिरिक्त बुटीबोरी क्षेत्रात उद्योगांसाठी अधिग्रहित केलेली जमीन संपली असून तिसरी अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक वसाहत तयार करावयाची आहे, तसेच वर्धा जिल्ह्यातील नवीन औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादन सुरू असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

    अवादा हा सोलर मॉडल बनवणारा सर्वात मोठा सुपर उद्योग असून, ॲडव्हान्स इंटिग्रेशन मुळे स्मार्ट मॉड्युलची निर्मिती होत आहे.  भूमिपूजनंतर वेगाने प्रकल्प पूर्ण झाला असून  आज पाच हजार कामगार येथे काम करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

    उद्योजकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, स्टील उद्योगांच्या विकासाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. उद्योजकांना स्वस्त वीज कशी उपलब्ध होईल या दृष्टीने प्रयत्न सुरू असून 2029 पर्यंत उद्योगांना स्वस्त वीज मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सोलर बॅटरी स्टोरेजच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून 24 तास ऊर्जा उपलब्ध होईल यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे उद्योगांना विजेचा प्रश्न राहणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

    गडचिरोली हे नवीन स्टील सिटी म्हणून उदयास येत असून तिथे चार लाख कोटींची गुंतवणूक आली आहे. बेल्जियमच्या कंपनीसोबत गडचिरोलीत ग्रीन स्टील बनवण्याचा सामंजस्य करार झाला असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

    समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या मागास भागात विकासाला आवश्यक असलेल्या सुविधा निर्माण होत असून जेएनपीटी बंधनासोबतच वाढवण पोर्ट बंदर हे जगातील पहिल्या दहा बंदरांमध्ये समाविष्ट होणार आहे, येथून डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर द्वारे गडचिरोली पर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. यामुळे लॉजिस्टिक खर्च 60 टक्के पेक्षा कमी होईल आणि राज्याच्या विकासाला मोठी संधी उपलब्ध होणार आहे वाढवण बंदर येत्या तीन वर्षात पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करताना वाढवण हे ग्रीन पोर्ट असून सर्वात सक्षम राहणार आहे.

    मुंबई येथील विमानतळावर खाजगी विमानांना कशा सुविधा देता येईल यासाठी विकासात व संबंधित यंत्रणांसोबत बोलून मार्ग काढण्यात येईल, असा विश्वास उद्योजकांना दिला.

    मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याच्या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, समूह विकास करण्याच्या दृष्टीने येथील रहिवाशांना पर्यायी घर देणे अथवा तीन वर्षाचे भाडे देत असल्यामुळे जागा मोकळी होण्यास मदत होत आहे येत्या दहा वर्षात मुंबई झोपडपट्टीमुक्त होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

    येत्या पाच वर्षात मुंबईचा चेहरा बदललेला असेल असा विश्वास व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले की, वांद्रे वर्सोवा मार्ग 2028 पर्यंत तर वर्सोवा ते भाईंदर नार्थ पोस्टल रोड मार्च 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष आहे. मुंबईतील 60 टक्के प्रवाशांसाठी वेस्टन एक्सप्रेसला एक पूर्णपणे सिग्नल फ्री समांतर मार्ग तयार केला जात आहे. अवघ्या 23 किलोमीटर साठी लागणारा दीड तासाचा वेळ या बोगद्यामुळे 15 ते 17 मिनिटांवरील हे काम पुढील चार वर्षात पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.

    00000

    - Advertisement -