ग्रामीण व आदिवासी भागातील आरोग्य सुविधांसाठी उद्योगांनी सीएसआरच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा – मंत्री प्रकाश आबिटकर

- Advertisement -


मुंबई, दि. २ : ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उद्योगांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीचा (सीएसआर) गरजाधारित, नियोजनबद्ध आणि परिणामकारक वापर करावा. राज्य शासनाच्या आरोग्यविषयक उपक्रमांना सहकार्य करण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राने पुढाकार घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

ताज हॉटेल येथे भारतीय औद्योगिक परिसंघातर्फे आयोजित ‘सीएसआर समिट’च्या उद्घाटनप्रसंगी सार्वजनिक आरोग्यमंत्री आबिटकर बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, भारतीय औद्योगिक परिसंघाच्या सीएसआर समितीचे अध्यक्ष बी. थिआगाराजन, माजी अध्यक्ष राजेश शहा, शिवानी कुमार यांच्यासह विविध कॉर्पोरेट कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले की, सामाजिक विकासाच्या प्रक्रियेपासून दूर राहिलेल्या घटकांपर्यंत आवश्यक सुविधा पोहोचविण्यासाठी सीएसआर हे प्रभावी माध्यम आहे. शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रांत शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जातो. त्याला सीएसआरची नियोजनबद्ध जोड मिळाल्यास विकासकामांची व्याप्ती आणि परिणामकारकता वाढू शकते. आरोग्य विभागातील सीएसआर उपक्रमांना सुसूत्रता आणण्यासाठी आणि उपलब्ध निधीचा गरजेनुसार वापर व्हावा, यासाठी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. विभागाच्या प्राधान्यक्रमानुसार उद्योगांनी सीएसआर उपक्रमांची आखणी केल्यास निधीचा अधिक परिणामकारक उपयोग होईल. शासन, उद्योग आणि संबंधित भागधारकांमध्ये सातत्यपूर्ण संवाद व समन्वय आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

आदिवासी आणि दुर्गम भागात डॉक्टरांसाठी आवश्यक निवास व्यवस्था, आरोग्य संस्थांचे पायाभूत बळकटीकरण, आधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि नवीन तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेसाठी सीएसआरच्या माध्यमातून सहकार्याची आवश्यकता आहे. मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या दर्जेदार आरोग्य सुविधा ग्रामीण भागातील नागरिकांनाही मिळाव्यात, हा शासनाचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांना उद्योगविश्वाची साथ मिळाल्यास आरोग्य सेवा अधिक सक्षम होतील, असे मंत्री आबिटकर यांनी नमूद केले.

सीएसआर निधीतून राबविण्यात येणारे उपक्रम स्थानिक गरजांवर आधारित असावेत. त्यासाठी आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या विविध संस्था, त्यांची सद्यस्थिती आणि आवश्यक पायाभूत सुविधांचा अभ्यास करून प्राधान्यक्रम निश्चित करावा. उद्योगांनी शासनाच्या विकास आराखड्याशी समन्वय साधून काम केल्यास खऱ्या अर्थाने गरजू नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविता येतील, असेही त्यांनी सांगितले.

भारतीय औद्योगिक परिसंघाने शासन आणि उद्योग क्षेत्राला एकत्र आणण्यासाठी उपलब्ध करून दिलेले हे व्यासपीठ महत्त्वपूर्ण आहे. या माध्यमातून विचारांचे आदानप्रदान होऊन सामाजिक गरजांनुसार ठोस उपक्रम राबविले जातील, असा विश्वास व्यक्त करून सार्वजनिक आरोग्यमंत्री आबिटकर यांनी विविध उद्योगाच्या प्रतिनिधींना राज्याच्या आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेण्याचे आवाहन केले.

यावेळी माजी मंत्री सुरेश प्रभू, बी. थिआगाराजन यांनीही विचार व्यक्त केले.

0000

धोंडिराम अर्जुन/विसंअ

 

 



Source link

- Advertisement -