
नंदुरबार, दि. ६ : महावितरण कंपनीने सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत विविध उपक्रमांद्वारे वीसावा वर्धापन दिन साजरा केल्याचे कौतुक करताना, विज वितरण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आवाहन राज्याचे कृषिमंत्री तथा नंदुरबारचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले.
महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त नंदुरबार शहरातील सीबी गार्डन येथे आयोजित कार्यक्रमात मंत्री कोकाटे बोलत होते. कार्यक्रमास महावितरणचे अधीक्षक अभियंता एस.एस. दराडे, डॉ. अभिजीत मोरे, रतन पाडवी, नरेंद्र नगराळे, मोहन शेवाळे, सिताराम पावरा यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले, “2006 मध्ये कंपनीच्या त्रिभाजनानंतर सुरू झालेल्या या प्रवासाला आज 20 वर्षे पूर्ण होत आहेत. कंपनीने आपल्या कार्यक्षमतेत सातत्य राखत उत्तम सेवा दिली असून, या माध्यमातून कार्यात सुसूत्रता निर्माण झाली आहे.” वर्धापन दिनानिमित्त महावितरणकडून रक्तदान शिबिर तसेच कर्मचाऱ्यांसाठी कौटुंबिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांचे ताण-तणाव कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास पालकमंत्री ॲड. कोकाटे यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, “नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असून येथील नागरिक प्रामाणिक व कष्टाळू आहेत. या भागात मनापासून काम केल्यास लोक त्याचे योग्य ते कौतुक करतात. त्यामुळे महावितरणचे अधिकारी-कर्मचारी कुठेही कमी पडणार नाही” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मंत्री ॲड. कोकाटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्वराज्य दिनाचेही स्मरण केले. “आजच्या दिवशीच छत्रपती शिवाजी महाराजांना ‘रयतेचा राजा’ म्हणून मान्यता मिळाली. राज्य सरकारने हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, याच पार्श्वभूमीवर मी उपस्थित आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी सर्व महावितरण अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या.
00000




















WhatsApp