मुरुड येथे ‘लोकसंवाद २०२६’ कार्यक्रमात आरोग्य विभागाच्या योजनांविषयी मार्गदर्शन – महासंवाद

    - Advertisement -

    लातूर, दि. २०: गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागामार्फत ‘लोकसंवाद २०२६’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मुरुड येथे महाराज गणेश मंडळाच्या कार्यक्रमात आरोग्य विभाग, खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या योजनांची माहिती देण्यात आली.

    एकत्रित आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व नागरिकांना युनिव्हर्सल हेल्थ कव्हर पुरवले जात आहे. या योजनेअंतर्गत कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्यांना प्रतिवर्ष ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य कव्हरेज दिले जात असून, मूत्राशय किंवा मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपणासाठी ४.५ लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य दिले जाते. याशिवाय, ज्येष्ठ नागरिकांना वैयक्तिकरित्या ५ लाख रुपयांपर्यंतचा अतिरिक्त लाभ दिला जातो, तसेच रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना पी. एम. राहत निधीतून १.५० लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत तातडीने वैद्यकीय उपचार पुरवले जातात, अशी माहिती आरोग्य विभागाचे धनंजय नवगिरे आणि गोविंद सुरवसे यांनी दिली.

    या योजनेमध्ये लाभार्थ्यांसाठी एकूण २,३९९ आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रियांची सुविधा उपलब्ध असून, त्यात शासकीय रुग्णालयांसाठी २२३ वैद्यकीय प्रक्रिया राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच हृदय, फुफ्फुस आणि यकृत प्रत्यारोपणासारख्या अत्यंत गंभीर व दुर्धर आजारांच्या उपचारासाठी सहाय्य दिले जात आहे. रुग्णांना सुलभ मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी आरोग्यमित्र नियुक्त करण्यात आले आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लातूर जिल्ह्यात १६ शासकीय रुग्णालये, ५० प्राथमिक आरोग्य केंद्रे, ५ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ४८ खाजगी रुग्णालये अशी एकूण ११९ रुग्णालये अंगीकृत करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

    जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी चिंतामणी गुट्टे यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मधाचे गाव आणि प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप यांनी लोकसंवाद उपक्रमाचा हेतू विशद केला.

    यावेळी मुरुडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश ठोंबरे यांच्यासह अभिषेक सहालुगडे, विकास सूर्यवंशी, शुभम जेलेवाड, विशाल कणसे, ओमकार करपे, अजिंक्य माळी, सौरभ सापसोड, रवी देशमुख, आकाश सुरवसे, गजानन वडगणे, सौरभ गायकवाड, गणेश वडगणे, ऋषभ हरंगुळकर, ऋषी राऊत, अजिंक्य नाडे, बंटी साळुंखे, रणजीत सुरवसे, दादा लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

    ००००

    - Advertisement -