- मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या परिणामकारकतेचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा
मुंबई, दि. ८ : शालेय शिक्षणात गुणवत्तावृद्धी घडवत विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, संवादकौशल्य आणि चांगल्या नागरिकत्वाचे गुण विकसित करण्यासाठी मूल्य शिक्षणाला विशेष महत्त्व आहे.सजग आणि जबाबदार नागरिक घडवण्यासाठी मूल्य आधारित शिक्षण काळाची गरज आहे.या पार्श्वभूमीवर राज्यात मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याची (2.0) अंमलबजावणी व्यापक स्तरावर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या परिणाम साध्यतेच्या मूल्यमापनाचा आढावा घेण्यात आला त्या वेळी ते बालत होते. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथ्था, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी, शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, एससीईआरटीचे संचालक हेमंत वसेकर यांच्यासह एसबीआय बॅंक,बंधन बॅंक फाउंडेशन तसेच फिरोदीया फाउंडेशन आणि शांतीलाल मुथ्था फाउंडेशन या भागीदार संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात केवळ अभ्यासक्रम महत्त्वाचा नसून शिक्षकांची अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची क्षमता आणि त्यांच्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची भूमिका अधिक महत्त्वाची आहे. मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना दिले जाणारे प्रशिक्षण विद्यार्थ्यांमधील भीती, संकोच आणि शंका दूर करण्यास मदत करत असून ज्ञानार्जनाची प्रक्रिया अधिक प्रभावी बनवत आहे. हे लक्षात घेऊन कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यांची अधिक प्रभावी अमंलबजावणी करावी.

शिक्षण विभाग, प्रशिक्षण संस्था आणि भागीदार संघटनांनी समन्वयाने काम करून शिक्षणाची गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत. विद्यार्थ्यांना केवळ गुणवंत नव्हे तर सजग, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक बनविण्यासाठी मूल्य शिक्षणाची चळवळ येत्या काळात व्यापक करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री यांनी केले.
मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि पालकांचा सहभाग वाढत असून शाळांमध्ये लक्षणीय बदल घडत आहे. शिक्षकांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन विकसित करण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याची राज्यासह देशपातळीवर दखल घेतली जात आहे.
शांतीलाल मुथ्था म्हणाले की, जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक उत्कृष्ट काम करत असून मूल्यवर्धन उपक्रम अत्यंत परिणामकारक ठरत आहे. शासनाकडून मिळणाऱ्या सहकार्यामुळे उपक्रमाची व्याप्ती आणि परिणामकारकता वाढत आहे.
शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी शाळांच्या वेळापत्रकात मूल्याधारित शिक्षणासाठी स्वतंत्र दोन तास असण्याची विचारधारा असल्याचे सांगितले. तर एससीईआरटीचे संचालक हेमंत वसेकर यांनी या उपक्रमामुळे अध्यापन पद्धतीत गुणात्मक बदल होत असल्याचे सांगितले.
बैठकीत राज्यातील विविध शिक्षक दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होते. पुणे, यवतमाळ, नांदेड, पालघर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील सहभागी शिक्षकांनी प्रातिनिधिक स्वरुपात मूल्यवर्धन उपक्रमामुळे शाळांमध्ये झालेल्या सकारात्मक बदलांचे अनुभव कथन केले. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढणे, वर्गातील सहभागात सुधारणा होणे आणि शाळेतील वातावरण अधिक सकारात्मक बनणे आदी बाबतचे अनुभव शिक्षकांनी सांगितले. या स्तुत्य उपक्रमाच्या यशस्वी अमंलबजावणीसाठी मुख्यमंत्री यांनी सर्व शिक्षक, सहभागी संस्था आणि संबंधित अधिका-यांचे अभिनंदन केले.
००००






















WhatsApp