दहीहंडी हा खेळ कॉमनवेल्थ आणि ऑलिम्पिक मध्ये नेण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- Advertisement -


मुंबई, दि.२५ : गोविंदा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि मुंबईची ओळख आहे. ‘प्रो गोविंदा’च्या माध्यमातून हा खेळ संपूर्ण भारतासह जगात पोहोचला आहे. गोविंदाच्या या साहसी खेळाला अखिल भारतीय स्तरावर मान्यता मिळवून देत एशियाड, कॉमनवेल्थ आणि पुढे ऑलिम्पिकपर्यंत नेण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

प्रो गोविंदा लीग २०२६ सिझन ४ चा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एसव्हीपी स्टेडियम, वरळी येथे पार पडला त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे, आमदार रणजीत पाटील, लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक, श्रीमती शायना एन. सी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या दहीहंडी उत्सवाला आधुनिक आणि व्यावसायिक क्रीडा स्पर्धेचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली प्रो गोविंदा लीग (पीजीएल) देशातील मानवी मनोरे रचण्याच्या खेळासाठीची पहिली व्यावसायिक लीग म्हणून ओळखली जाते. दहीहंडी हा केवळ उत्सव नसून समाजाला एकत्र आणणारा आणि सामाजिक अभिसरणाचा संदेश देणारा उपक्रम आहे. गोविंदांनी एकमेकांना आधार देत मानवी साखळी तयार करून हंडी फोडण्याची परंपरा जपली आहे. भगवान श्रीकृष्णांनी दिलेला ‘संपूर्ण समाज एक आहे’ हा संदेश या खेळातून अधोरेखित होतो. एकीच्या बळावर कोणत्याही संकटाचा सामना करता येतो आणि मोठे कार्य साध्य करता येते.

या खेळाला अखिल भारतीय स्तरावर ऑलिम्पिक असोसिएशन तसेच संबंधित क्रीडा संघटनांची मान्यता मिळवून देणे त्यानंतर हा खेळ एशियाड, कॉमनवेल्थ आणि अखेरीस ऑलिम्पिकपर्यंत नेण्याच्या दृष्टीने शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्री यांनी सर्व गोविंदा पथके, त्यांचे प्रशिक्षक तसेच गोविंदांना प्रोत्साहन देत शुभेच्छा दिल्या.

मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, दही – हंडी ( प्रो गोविंदा) खेळाला राज्य शासनाने साहसी खेळाचा दर्जा दिला आहे.  तसेच शासन २०२३ पासून गोविंदांना विमा देत आहे. यावर्षी गोविंदांची संख्या वाढवून एक लाख ६० हजार गोविंदा ना विमा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी १६ संघ आणि ३२०० गोविंदांनी सहभाग घेतला असून, तीन दिवस या स्पर्धा सुरू रहाणार आहेत.

0000

श्रद्धा मेश्राम/विसंअ

 



Source link

- Advertisement -