शेतपिकाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

    - Advertisement -

    वीज पुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे निर्देश

    अमरावती, दि. १९: गेल्या महिन्याभरात जिल्ह्यात पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर या पिकांच्या परिस्थिती सुधारली नाही. परिणामी उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

    पालकमंत्री बावनकुळे यांनी आज तिवसा तालुक्यातील किशोर पिंपळे, राजू बहाद्दरपुरे यांच्या शेतामध्ये जाऊन प्रत्यक्ष नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली. यावेळी आमदार प्रवीण पोटे, प्रताप अडसड, राजेश वानखेडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते आदी उपस्थित होते.

    पिकावर परिणाम झाला आहे. पावसाअभावी सोयाबीन दाणे परिपक्व अवस्थेत आलेले नसल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे. परिणामी शेतकऱ्याचे उत्पन्न कमी होईल. यासाठी उपाययोजना म्हणून तातडीने नुकसान झालेल्या शेतपिकाची पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर करून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्याचा आग्रह राहील. ही पिक पाहणी करीत असताना संपर्काची समस्या आल्यास त्या ठिकाणचे पंचनामे ऑफलाइन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

    सध्यास्थितीत कापूस, तूर आणि संत्रा पिकांना सिंचनाची व्यवस्था झाल्यास ही पिके काही दिवस तग धरू शकतील अशा अवस्थेत आहे. मात्र काही भागात कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे सिंचनाबाबत अडचणी येत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. याबाबत पालकमंत्री बावनकुळे यांनी शेताच्या बांधावरूनच सचिव लोकेशचंद्र यांना दूरध्वनीवरून संपर्क करून याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तसेच नादुरुस्त असलेले सोलार कृषीपंपाच्या कंत्राटदारांना दोन दिवसात बोलावून दुरुस्त करण्याचे सांगण्यात आले.

    पिकांची अवस्था ठीक नसल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गेल्या वर्षीही 1140 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत आहे. शेतकऱ्यांबाबत शासन संवेदनशील असून पिकांचे पंचनामे आणि शेतकऱ्यांना आवश्यक गरज असलेल्या सवलती देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

    ००००

    - Advertisement -